मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या अमरावती व चिमूरमध्ये जाहीर
मुंबई/चंद्रपूर: देशात दोन विचारधारांची लढाई; काँग्रेस संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात तर भाजपा संविधानावर हल्लाबोल
देशात सध्या दोन भिन्न विचारधारांची संघर्ष सुरू आहे. एका बाजूला काँग्रेस व इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी ठामपणे उभी आहे, तर दुसरीकडे भाजप व आरएसएसकडून संविधानावर सातत्याने हल्ले होत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या प्रचार सभांसाठी अमरावती व चिमूर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये राहुल गांधी यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. धारावीतील १ लाख कोटी रुपयांच्या जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपा व उद्योगपती अदानी यांच्यातील असंवैधानिक मिलीभगत उघड केली.
जातनिहाय जनगणना आणि आरक्षणावर आघाडीची ठाम भूमिका
राहुल गांधी यांनी संसद अधिवेशनातील चर्चांचा उल्लेख करताना सांगितले की, काँग्रेस व इंडिया आघाडीने जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यावर काँग्रेस आग्रही आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड तास भाषण करूनही या मुद्द्यावर एक शब्दही उच्चारला नाही.
“नरेंद्र मोदी फक्त मन की बात करतात, पण जनतेच्या समस्या ऐकत नाहीत,” असे सांगत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. जीएसटी व नोटबंदीचे निर्णय अदानी-अंबानींच्या फायद्यासाठी घेण्यात आले असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. “या निर्णयांमुळे छोटे, मध्यम व लघु उद्योग ठप्प झाले, रोजगाराचा बळी गेला आणि देशातील सामान्य माणूस अडचणीत आला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारचे आश्वासने
राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या सत्तेतील येणाऱ्या योजनांवर प्रकाश टाकत सांगितले की:
- शेतकऱ्यांसाठी ३ लाखांपर्यंत कर्जमाफी
- सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल दर
- कांदा व कापूस उत्पादकांना योग्य दर मिळवून देण्यासाठी विशेष योजना
- महिलांसाठी २५ लाखांचा आरोग्य विमा, दरमहा ३ हजार रुपयांची मदत आणि मोफत बस प्रवास
- सरकारी रिक्त जागांची भरती आणि रोजगारनिर्मिती
मोदी सरकारच्या धोरणांवर टीका
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करत म्हटले की, “मोदी हे फक्त अरबपतींच्या फायद्यासाठी काम करतात. त्यांनी आता सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्यास सुरुवात करावी.” महागाई कमी करणे, शेतमालाला हमीभाव देणे, आणि रोजगारनिर्मिती करणे हेच देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महापुरुषांचे विचार आणि संविधानाची रक्षा
राहुल गांधी यांनी भाजपवर संविधानाच्या पायमल्लीचा आरोप केला. “महापुरुषांच्या विचारांवर आधारित संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले.
देशात संविधान आणि आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडी संघर्ष करत राहील, असा निर्धार राहुल गांधी यांनी या प्रचारसभांमध्ये व्यक्त केला.